मॉस्क्विरिक्स : पहिली मलेरिया लस

मॉस्क्विरिक्स : पहिली मलेरिया लस

  • अलीकडेच, जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) जगातील पहिल्या मलेरिया लसीला मान्यता दिली आहे.
  • RTS, S/AS01 असे नाव असणारी ही लस मॉस्क्विरिक्स (Mosquirix) नावाने विकली जाईल.ही एक इंजेक्टेबल लस आहे जी प्लाझमोडियम फाल्सीपेरम या मलेरियाच्या आदीजीवास लक्ष्य करेल.
  •  लहान मुलांमध्ये आंशिक संरक्षण दर्शविणारी ही पहिली आणि एकमेव लस आहे.
  •  सदर लस ब्रिटिश औषधनिर्माता ग्लॅक्सो स्मिथ क्लाइनने १९८७ मध्ये विकसित केली.
  • मॉस्क्विरिक्समधील सक्रिय पदार्थ प्लाझमोडियम फाल्सीपेरम आदीजीवींच्या शरीरावर आढळणाऱ्या प्रथिनांनी बनलेला असतो.
  • ही लस शरीरामध्ये गेल्यानंतर आपली रोगप्रतिकारक शक्ती सक्रिय होऊन शरीरामध्ये मलेरियाविरुद्ध प्रतिकार निर्माण होतो.
  • ही लस हिपॅटायटीस बी विषाणूसह यकृताच्या संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते.
  • मुलांमध्ये मलेरियाची गंभीर प्रकरणे रोखण्यासाठी लसीची प्रभावीता केवळ ३०%आहे, परंतु ही एकमेव मंजूर झालेली लस आहे.
  • लसीचे दुष्परिणाम सहसा होत नाहीत, परंतु कधीकधी ताप येऊ शकतो.

लसीपुढील आव्हाने : 

  • २ वर्ष पूर्ण होण्याअगोदर मुलाला चार इंजेक्शन मिळणे आवश्यक आहे.
  • २००९ ते २०१४ पर्यंत १०,००० पेक्षा जास्त आफ्रिकन मुलांच्या चाचण्यांनी हे सिद्ध केले की, चार डोस नंतरही, लसीने केवळ ४०% मलेरियाचे संक्रमण रोखले आहे.
  • लसीद्वारे मिळालेले संरक्षण किती काळ टिकेल हे अद्याप अस्पष्ट आहे.
  • गेल्या दोन दशकांमध्ये ११ देशांना जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालकांनी मलेरियामुक्त म्हणून घोषित केले आहे: संयुक्त अरब अमिराती (२००७), मोरोक्को (२०१०), तुर्कमेनिस्तान (२०१०), आर्मेनिया (२०११), श्रीलंका (२०१६), किर्गिस्तान (२०१६), पॅराग्वे (२०१८), उझबेकिस्तान (२०१८), अल्जेरिया (२०१९), अर्जेंटिना (२०१९),अल साल्वाडोर (२०२१), चीन(२०२१). जगभरामध्ये  जागतिक आरोग्य संघटनेने केवळ ४० देशांना मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे.
  • ज्या देशांमध्ये गेल्या तीन वर्षात एकही स्थानिक मलेरिया रूग्ण आढळला नाही असे देश जागतिक आरोग्य संघटनेद्वारे मलेरिया मुक्त म्हणून घोषित होण्यासाठी पात्र असतात.

भारत आणि मलेरिया ( हिवताप)

  • भारत असा एकमेव उच्च संक्रमण असणारा देश आहे ज्याने सन २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये १७.६% घट नोंदविली आहे. 
  • २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये  मलेरियाचा संक्रमण दर सुमारे २४ टक्क्यांनी कमी करण्यात भारताला यश आले होते.
  • १९५१ मध्ये सुमारे साडेसात कोटी लोकांना मलेरियाची लागण झाली होती
  •  त्यामुळे सुरुवातीपासून भारतामध्ये मलेरिया हा अतिशय गंभीर आजार समजला जातो.
  •  १९५३ मध्ये राष्ट्रीय मलेरिया नियंत्रण कार्यक्रम भारताने सुरू केला आणि आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांना सुरुवात झाली.
  • पुढे १९५८ राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रम जाहीर करण्यात आला.
  • २००५ मध्ये राष्ट्रीय गहन हिवताप नियंत्रण कार्यक्रम जाहीर केला ज्यामध्ये डीडीटी फवारणी, मॅलॅथिऑनचा वापर, गप्पी मासे पाळणे इत्यादी बाबींचा समावेश  होता.
  • ११ फेब्रुवारी २०१६ ला केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी २०३० पर्यंत हिवतापाचे निर्मूलन आणि शाश्वत विकास ध्येय गाठण्यासाठी मलेरिया निर्मूलनासाठी राष्ट्रीय चौकट (National Framework For Maleria Elimination : २०१६ – २०३०) जाहीर केली.
  • या चौकटीनुसार २०२२ पर्यंत कमी लागण  हे असलेल्या राज्यातून मलेरियाचे निर्मूलन करणे, २०२४ पर्यंत सर्व राज्यांमधून निर्मूलन करणे, २०२७ पर्यंत मलेरियाचा संपूर्ण प्रसार रोखणे आणि २०३० पर्यंत मलेरिया मुक्त पातळी गाठणे याचा समावेश आहे. 
  • वरील प्रयत्न बघता आणि देशातील सध्या असणारी मलेरियाची स्थिती बघता भारताने खूप चांगली प्रगती केलेली आहे.
  •  मलेरिया निर्मूलनामध्ये ओडिशा हे राज्य  दमन ( Durgama Anchalare Malaria Nirakaran – DAMaN) या उपक्रमामुळे आघाडीचे राज्य बनले आहे.
  • मलेरिया आजार प्लाज्मोडियम  या आदिजीवामुळे होतो.या आदिजीवाचा प्रसार ॲनाफिलीस या प्रजातीच्या मादी डासामुळे होतो.

Contact Us

    Enquire Now