
टोलनाक्यांवर १०० मीटर्सपेक्षा मोठी रांग असल्यास ‘टोलमुक्ती’
- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या टोलनाक्यांवर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांची सुटका होण्यासाठी प्राधिकरणाने नवीन उपाय केला आहे.
- टोल नाक्यांवर १०० मीटर्सपेक्षा अधिक अंतरावर वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागल्या असतील, तर टोल न आकारताच वाहनांना पुढे पाठवण्यात येणार आहे.
- याबाबत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशभरातील टोलनाक्यांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे आखली आहेत. या नियमाची अंमलबजावणी करण्यासाठी टोल नाक्यांवर १०० मीटर्सपर्यंत पिवळी रेषा आखली जाणार आहे.
- जोपर्यंत वाहनांची रांग १०० मीटर्सपेक्षा कमी होत नाही, तोपर्यंत त्या चालकांकडून टोल घेतला जाणार नाही, असे मार्गदर्शक तत्त्वात नमूद आहे.
- राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यांवर फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्यानंतर टोलची रक्कम ऑनलाइनच घेतली जाते. फास्टॅगमार्फत टोल घेताना प्रवाशांचा झटपट प्रवास होईल, अशी आशा प्राधिकरणाला होती.
- परंतु काही टोलनाक्यांवर टोल घेताना तांत्रिक कारणास्तव बराच वेळ जातो. त्यामुळे चालकांना मोठा मनस्ताप होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात आली आहेत.